Saturday 5 January 2013

पांडवांचा–म्हणजे आपल्या घरचा

चित्रांगदा

अश्‍व शाळेतील शामकर्णाच्या कपाळावरील सुवर्ण-पत्रिका वाचून बभ्रुवाहनाचे मन गोंधळले. “युद्ध करावं, की नजराणा घेऊन श्यामकर्ण परत करावा,” यावर त्याला निर्णय घेता येईना. आजपर्यंत अनेक संकटांना त्याने धैर्याने तोंड दिले होते, तो विजयीही झाला होता; पण आजचा प्रश्‍न नाजूक होता. आईच यातून योग्य तो मार्ग दाखवील असा विचार करुन तो तिच्या महालाकडे निघाला.
चित्रांगदा महालात एकटीच होती. अनुमती विचारुन बभ्रुवाहन आत गेला. नमस्कार करुन तिच्या जवळच्या आसनावर बसला. त्याला असं अचानक आलेला पाहताच तिने विचारले, “आज असं अचानक येणं केलं ? दरबारात जायचं नाही ?”
“दरबारातच निघालो होतो ; पण सेवकांनी एक घोटाळा करुन ठेवलाय. त्यासाठी…”
“सेवकांनी केलेला घोटाळा तू राजा असून तुला निस्तरता येत नाही ?”
“आई, प्रश्‍न मोठा नाजूक आहे, म्हणून तुला विचारायला आलो आहे.”
“सांग, कसला घोटाळा केला आहेस ?”
“सेवकांनी अश्‍वमेधाचा श्यामकर्ण अश्‍वशाळेत बांधून ठेवला आहे, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.”
“त्यात कसला पेच ? बभ्रुवाहना, युद्धाची भीती वाटायला लागली की काय ? अरे, तुझा पिता इथे नसताना तुला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं. असं असताना तुला साधे प्रश्‍न सोडवता येत नाहीत.”
“आई, मी युद्धाला भीत नाही; पण श्यामकर्ण पांडवांचा आहे.”
“पांडवांचा–म्हणजे आपल्या घरचा–”
चित्रांगदेचा चेहरा बदलला. बभ्रुवाहनावरचा क्षणैक क्रोध मावळला. ती वेगळ्याच विचारांनी सुखावली. तिच्या बदलत्या मुखकमलाकडे पाहत बभ्रुवाहन म्हणाला, “आई, यासाठीच तुला विचारायला आलो आहे. अर्जुन स्वतः घोडयाचं रक्षण करीत आहेत. आता तूच सांग, सेवकांनी श्यामकर्ण बांधला म्हणून क्षात्रधर्माला अनुसरुन युद्धाला सज्ज होऊ की आपल्या घरचा अश्‍वमेध आहे म्हणून श्यामकर्ण घेऊन जाऊन पार्थचरणांना वंदन करु ? क्षात्रधर्म की पुत्रधर्म ? तूच सांग आई, कोणत्या धर्माचं पालन करु ?”
बभ्रुवाहनाचा प्रश्‍न ऐकून क्षणभर चित्रांगदाही विचाराक्रांत झाली. त्याला काय सांगावे हे तिला समजेना. तोच बभ्रुवाहन पुढे म्हणाला, “आई, माझं धनुर्विद्येचं शिक्षण सुरु असताना तू नेहमी म्हणायची, ’तू इतका पराक्रमी हो की, ह्यांनी तुला ’पराक्रमी’ म्हटलं पाहिजे.’ भारतीय युद्धातच पराक्रम दाखविण्याची माझी इच्छा होती; पण लहान असल्याने जाता आलं नाही. आई, मला वाटतं, आता पराक्रमाची संधी आली आहे. तेव्हा आता युद्धात भाग घ्यावासा वाटतो.”
“काय ? तू अर्जुनांशी युद्ध करणार ? अरे, आपल्या घरचा हा अश्‍वमेध. तेव्हा पुत्रधर्माचं पालन करायचं सोडून त्यात तू विघ्न आणायचा विचार करतोस ?”
“असं मी कसं करीन ?”
“मग-”
“अगं आई, युद्धात भाग घेऊ इच्छितो म्हणजे आता तातांना विश्रांती देऊन, श्यामकर्णाचं रक्षण करायला आम्ही स्वतः जावं, असं म्हणतो,. आपल्या घरच्या यज्ञात ही मदत करायलाच हवी, असं मला वाटतं. मी असताना तातांना आता त्रास कशाला ?”
“बाळ–बभ्रू–”
चित्रांगदेचा कंठ दाटून आला. आपल्या गुणी मुलाचं तिला कौतुक वाटलं. ती भारावून म्हणाली, “बाळा, तुझं म्हणणं वीर पुत्राला साजेसं असून क्षात्रधर्मालाही अनुसरुनच आहे.”
“आई, पण हे तातांना पटेल का ? ते क्षात्रवीर आहेत. मी त्यांना सामोरा गेलो तर त्यांना आवडेल का ? त्यांना हे आवडलं नाही तर ?”
“तेही खरंच !”
“म्हणून तर खरा प्रश्‍न आहे. इथे पुत्रधर्म आणि क्षात्रधर्म परस्परविरोधी आहेत.”
“तुझा प्रश्‍न योग्य असला तरी, इथं आपल्या घरचाच यज्ञ असल्याने, शरण जाण्याचा प्रश्‍न येतोच कुठे ? ही पितापुत्रांची भेट आहे. पित्याची भेट घेण्यात, त्यांना नम्रतेने सामोरे जाण्यात वीरपुत्राला काही कमीपणा आहे असं मला वाटत नाही.”
“मलाही तेच वाटतं. आई, तुझ्या इच्छेप्रमाणे सारे करतो.”
बभ्रुवाहनाने आईला नमस्कार केला. ति
...

No comments:

Post a Comment